शाळेच्या वाटेवर सुखाचा फुलोरा,
इवल्याश्या बाळमुठीत सुटणारा पारा ।
आठवणींची गर्दी होते जीवाचं पाखरू,
चल दोस्ता सोबतीनं त्याच बाकावर बसू ।
अंगत - पंगत, सहली, रंगल्या उदंड,
किती पैशात कुठे आता मिळती हे आनंद?
तिथली शिकवण, साठवण, मज्जा,
जीवनाचा भाग बनते कायमचा सर्वांच्या।
आठवणींची भरली ओंजळ आयुष्याला पुरते,
कुपी उघडता अत्तराची कण कण घमघमते ।
धावत्या काळात हे विसाव्याचे बिंदू ठरती,
रणरणत्या उन्हात जणू चांदण्या लुकलुकती ।
गेले ते गेले न मिळते परत !
परी शांत एका क्षणी तोच चाफ्याचा दरवळ...
- डॉ अतिंद्र सरवडीकर
No comments:
Post a Comment