दु:खाचा मेघ सावळा, अन् सृजनाचे रंगीत पाणी...
कळी निरागस, अबोध, कोमल, वावटळी अन् वारा निर्मम...
प्रेमाची ओढ अनावर, अन् विरहाची रात्र काजळी...
कुठे युगुलांचे धुंदीत नर्तन, कुणा भाळी अन् कसे एकाकीपण?
कुठे सांडते शिवार दाटून, कुणी भुकेेले तसेच व्याकुळ...
प्रारब्धाचा असला वाटा, सांग कुणी का घेते वाटून?
कुणा सापडे पाचू माणिक, कुणा मुखी कनकाचा चूषक
अन्नोदक शोधत शोधत, कड्या कपारी कोणी भटकत...
प्रश्न पडे मग कोण मांडते? विरोध भरले असले जीवन?
पाहत बसतो का उगाच गंमत? कळसूत्रीचा वरचा मालक?
मग वाटते स्वस्थ बसावेे, काय चालले गप्प पहावे!
नियतीचे फासे ओघळते, पडे दान हसूनी स्विकारावे
साचल्या इच्छा, रूतले मी पण, त्याच्या ठायी सोडून द्यावे,
आपण आपले कार्य करावे, प्रयत्नांचे अर्घ्य अर्पावे
दु:खालाही मग सुगंध यावा, वेदनेलाही यावी लज्जत!
हसता हसता एका वळणावर, क्षण तृप्तीचे यावे अलगद...
- डॉ अतिंद्र सरवडीकर