पाडवा म्हणजे आईचा (वृंदा सरवडीकर) वाढदिवस... कणखर, खंबीर, प्रखर स्वाभिमानी पण संवेदनशील स्वभाव हे तिचं वैशिष्ट्य आणि तसंच कर्तृत्वही! म्हातारपणची काठी बनून आई-वडिलांचा मायेने सांभाळ केलेली कर्तबगार मुलगी, गृहकृत्यदक्ष गृहिणी, यशाचं शिखर गाठण्यासाठी मुलांना सतत प्रेरित करणारी आई, अनेक विद्यार्थ्यांना नुसतं संगीतच नाही तर जीवनाचे ही धडे देणारी आदर्श गुरू, असे अनेक पैलू तिच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत.
तिने इंग्लिश विषयात पदवी मिळवली आहे. गणित विषयाची तिला मनस्वी आवड! छंद म्हणून ती गणितं सोडवायची... तिचं गणित इतकं चांगलं होतं, की संगीत शिक्षिका असतानाही ती नववी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि इंग्रजीच्या अनेक वर्ष शिकवण्या घ्यायची. मुलं सांगायची गाण्याच्या मॅडमकडे आम्ही गणित शिकायला जातो!
आई स्व. दत्तूसिंह गहेरवार सरांची संगीताची विद्यार्थिनी, सोलापुरात अगदी सुरुवातीला संगीत विशारद ही पदवी ज्यांना मिळाली त्या पहिल्या बॅचची १९६७ सालातली ! सवाई गंधर्व आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या इंदिराबाई खाडिलकर यांनी तिची संगीत विशारद ची परीक्षा घेतली होती. गात असताना खाली रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडीचा हॉर्न वाजला तर इंदिराबाईंनी म्हणे थांबवून त्या हॉर्न चे सूर ओळखायला सांगितले होते, इतकी कठीण असे त्या काळी संगीत विशारदची परीक्षा! सिद्धेश्वर हायस्कूल प्रशालेने तर तिला सन्मानाने आमंत्रण देऊन खास बोलावून घेतलं होतं, कारण त्या काळात संगीत विशारद पदवी असणारे संगीत शिक्षक लाभणं हे अतिशय दुर्मिळ असायचं!
१९७१ साली राष्ट्रीय पातळीवर पार पडलेल्या आणि अत्त्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कालिदास संगीत स्पर्धेत आईला दुसरा क्रमांक मिळाला होता. त्या वेळी परीक्षक होते विख्यात संगीतकार सी रामचंद्र आणि पद्मभूषण विनायकराव पटवर्धन. विनायकराव हे तर गहेरवार सरांचेच गुरु त्यामुळे विनायकराव आणि गहेरवार सर या दोघांना ही हे यश अभिमानास्पदच होतं. आईचा थोडा खालच्या पट्टीतला पण ठोस आवाज आणि गमकेची वजनदार तान याचं विनायक बुवांनी खूप कौतुक केलं होतं! विख्यात चित्रपट कवी शांताराम नांदगावकर यांनी आईला मुंबईत येऊन रहायचा आणि गायिका म्हणूनच करीअर घडवायचा आवर्जून सल्ला दिला होता, पण त्या काळाच्या एकूण पार्श्वभूमीवर तसं होऊ शकलं नाही.
पुढे संसाराच्या रहाटगाडग्यात गायिका होण्याचं मागे पडलं पण स्वान्त सुखाय संगीत साधना मात्र अगदी नियमित सुरूच राहीली. तिचं उत्तम आणि चौफेर वाचन ही वाखाणण्याजोगं! फक्त मुलांच्या शाळेतला ६०-७० विद्यार्थ्यांचा तिचा अख्खा वर्ग हाताने ताल देऊन भूप, यमन, दुर्गा सारख्या रागांच्या बंदिशी गायचा. आज शाळांमध्ये सिनेमाची शालेय मुलांच्या वयाला न शोभणारी गाणी शिकवणारे संगीत शिक्षक पाहिले की मला आईचं हे कार्य आवर्जून जाणवतं. एकदा एका इंग्लिश गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनी म्हणे आई समोर संगीताला कमी लेखलं आणि त्यांचाच विषय शिकवण कसं अवघड आहे याचं वर्णन केलं, आईने तात्काळ करारी पणे उत्तर दिलं मी तुमचा विषय शिकवते तुम्ही माझा विषय शिकून दाखवा. एका बेसूर विद्यार्थ्याला जरी तुम्ही सुरात आणू शकलात तरी तुमचे शब्द मी मान्य करेन !
देवा समोर हात जोडले की "आम्हाला खूप कष्ट करायची शक्ती दे आणि आमच्या कष्टांना यश दे" एवढंच मागायचं असतं असं आईने आम्हाला शिकवलंय. या प्रार्थनेचा अर्थ खोलवर आम्हा मुलांमध्ये रूजलाय...
आईच्या वडीलांना नानांना अंधत्व आलं होतं. अनेक वर्ष ते त्या अवस्थेत होते. आईने अतिशय कष्टाने आणि मायेने त्यांचा कायमचा सांभाळ केला. पप्पांनी जावई असून कसल्याही अपेक्षे शिवाय मुलासारखी त्यांची सेवा केली. नानांना तीन वेळा मध्यरात्रीतून हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतरची सगळी धावपळ आठवली की आजही अंगावर शहारा उभा राहतो. आईने अत्यंत धीराने सगळ्याला तोंड दिलं, त्यांना बरं केलं. शेवटी नानांनी आई पपांना आणि आम्हा मुलांना तोंडभरून दिलेला आशिर्वाद आज सर्वार्थाने फळाला आलाय.
मे महिन्यात पप्पा आम्हाला सोडून गेले. मोठा कठीण काळ आम्ही पाहीला. पप्पा ३८ दिवस आयसीयू मध्ये होते. याच काळात मला आणि प्रियालाही कोरोना झाला. मला तर १० दिवस हॉस्पिटलमध्ये एडमिट व्हावं लागलं होतं. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने दादा वहिनी येऊ शकत नव्हते. ताळेबंदीमुळे इतर कुणी मदतीलाही येऊ शकत नव्हतं. आईच्या कणखर स्वभावाचा आणि धीरोदात्तपणाचा सगळ्यांना परत एकदा अनुभव आला.
पप्पा गेल्यानंतरच्या मधल्या काळात आई माझ्याकडे मुंबईला घेऊन राहिली. थोडी शांत वाटत होती. सगळं पूर्वपदावर यायला लागलं तसं म्हणाली मी आता सोलापूरला जाते, माझे विद्यार्थी वाट बघत असतील. म्हातारी झाले असले तरी अजून माझं करिअर संपलेलं नाही. मी अनेक रागांमध्ये नव्या बंदिशी बांधलेल्या आहेत त्या मधल्या अनेक तिने तिच्या अत्यंत सुंदर वळणदार अक्षरात लिहून घेतल्या. म्हणाली आता तुझ्या या नव्या बंदिशी शिकवते मुलांना, तेव्हढाच बदल होईल.
दिवाळीच्या सुट्टीत आम्ही सोलापूरला आलो. आईची नुकतीच एसएनडीटी विद्यापीठ मुंबई येथून संगीतात एम ए झालेली विद्यार्थिनी मृदुला म्हसकर पास झाल्याचे पेढे देऊन गेली होती. समूह सुरात बाकीचे विद्यार्थी वृंदावनी सारंग रागातील माझीच बंदिश गात होते...
जगत जननी देवी लछुमी
सकल जीव शरन तिहारी ।
देहो दान कृपा संपद
तेज बल धीरज मांगत
दूध पूत अन धान ।।
ताक: 31 जानेवारी 2025 रोजी आईला देवाज्ञा झाली. केवळ 15 दिवसाचं रक्तातील साखर कमी - जास्त झाल्याचं आजारपण झालं आणि ती झटकन निघून गेली. तत्पूर्वी सवाई गंधर्व महोत्सवातलं माझं गाणं तिने ऐकलं याच समाधान राहील. चालायला थोडा त्रास होत होता तर खास गाडी करून पुण्याला आली. रात्रभर प्रवास केला. तिची मनोभावे सेवा केलेला शिष्य सुमेध परळकर तिच्या सोबत होता. तिने म्हणे फार पूर्वी माझ्या लहानपणी ठरवलं होतं की माझा मुलगा जेव्हा केव्हा सवाई गंधर्व महोत्सवात गाईल तेव्हा मी पैठणी नेसून गाणं ऐकायला बसेन. तिचा शब्द तिने खरा केला. अंजिरी रंगाची सुंदर पैठणी नेसून ती आली, आणि मन लाऊन गाणं ऐकलं! फार आनंदात होती. मी एवढ्या मोठ्या मंचावर नवीन राग तयार करून गाण्याचं धाडस केलं याचं खूप कौतुक केलं. नंतरही आल्या गेल्याना हे कौतुक सांगत राहिली. खरतर असलं धाडस करायचं बळ आईच्या संस्कारांमुळेच माझ्याकडे आलंय. आता या सगळ्या आठवणींनी सतत दाटून येतंय. आईचे अनेक शिष्य दूरवरून भेटायला येत आहेत, फोन करत आहेत, सुंदर लेख लिहित आहेत. सगळ्यांच्या मनात तिच्याबद्दल अपार आदर आहे आणि डोळ्यात अश्रू... व्रतस्थपणे जीवनाची वाट चालून आईने स्वतःच्या जीवनाचं सोनं केलं आणि गुरू म्हणून अनेकांना योग्य मार्ग दाखवला. So proud of you Aai ❤️
No comments:
Post a Comment