एकवटू दे सगळ्या जाणिवा रियाज करताना,
कशाचाही नको अडथळा सूर शोधताना।
काळ व्हावा मंद थोडा अन् पडावा चिंतेचा विसर,
स्वतःलाही विसरून जावं असा रहावा गहिरा असर ।
मनाची कवाडं गच्च बंद होऊ देत जगासाठी,
ओंकाराचे कोंब गात्रा गात्रातून फुटण्यासाठी ।
त्या कोंबाचं होऊ दे झाड, झाडाचा वटवृक्ष,
वृक्षाचं मग अरण्य होऊ दे माझ्याही नकळत।
तिथल्याच एखाद्या बोधी वृक्षाखाली,
होऊ दे साक्षात्कार अस्तित्व माझं उजळत ।
प्रश्नांचा मग गोफ सुटू दे, द्वंद्वाचा अवघड घाट सरु दे,
इर्षा, हेवा मागे पडून स्वतःची सुंदर वाट मिळू दे ।
अर्थ लागो साऱ्या क्रियांचा, व्याप सरो नुसत्या करण्याचा,
'मी' माझे पण गळून पडता; स्पर्श होवो नव सृजनाचा ।
सूर नको नुसता गळ्यातून, गात्र गात्र सळसळू दे !
अस्तित्व त्याचं जाणवून भोवती, कण कण खळबळू दे ।
शब्दापलिकडचं सांगायचं ते उमटू दे अलगुज!
कारुण्य, वेदना, तळमळ निववून अवघं फिटू दे ऋण |
श्रोताही भारावू दे मग जाणवून ती संवेदना...
मंचावर ही साथ राहू दे, मनोभावे केली साधना...
मग रियाजच व्हावा नामजप अन् रियाजंच व्हावा दिंडी,
शांतवून अवघ्या अस्तित्वाला रियाजंच व्हावा मुक्ती...
- डॉ अतिंद्र सरवडीकर ©